Tuesday, May 11, 2010

पुणेरी पाट्या

पुण्यातील इरसाल पाट्या हा पुणेकरांसाठी अभिमानाचा विषय आहे. आम्ही (च्यामारी! पुण्याबद्दल नुस्तं लिहायला लागलो तरी "मी" चा "आम्ही" होऊन जातो!) पुण्यात संगणक भाषा शिकत असता (पक्षी: डेक्कन जिमखाना, क्याम्प वगैरे प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत असता) अश्या अनेक पाट्या आमच्या नजरेस पडल्या, तर काही ई-मेल मध्ये वाचायला मिळाल्या. 
काही नमुने आपल्यासाठी पेश करत आहे...

  • कृपया वस्तू ऊधार मागू नये. अपमान होईल.
  • दारावरील बेल फ़क्त एकदाच वाजवावी. विजेचे बिल आम्ही भरतो.
  • तीनदा बेल वाजवूनही दरवाजा न उघडल्यास समजावे कि आम्हांस आपणास भेटावयाचे नाही.
  • आम्ही शाकाहारी आहोत, पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही.
  • इथे मुत्रविसर्जन करू नये. केल्यास कायमचा ईलाज केला जाईल.
  • इथे कम्प्युटर सीडीज, फ़्लॊपीज व स्वस्त दरात नारळ मिळतील.
  • इथे हापूस आंबे, कोकम सरबत व परकर मिळतील.
  • गिर्हाईक हा राजा असतो. राजा कधीही ऊधार मागत नाही.
  • मस्तानी पार्सल करून मिळेल.
  • मंदिरात जास्त वेळ बसू नये. तुम्ही रिकामटेकडे असाल, पण ही बाग नाही.
  • शांतता राखा. थुंकू नका. माणसासारखे वागा.
  • सेल्समनांस सुचना: सदर इमारतीत विक्री न झाल्यास सोसायटी जबाबदार नाही.
  • सोसायटीच्या सभासदांशिवाय अन्य अवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य.
  • इथे जोशी रहात नाहीत. पुन्हा पुन्हा विचारू नये.
    (व त्याच घरासमोरील पाटी): जोशी इथे रहातात. इकडे-तिकडे विचारू नये.
  • फ़ाटकावरील आतील बाजूची पाटी: बाहेर जाताना फ़ाटक बंद न केल्यास पुन्हा आत घेतले जाणार नाही.
  • बंगला रिकामा आहे. आत चोरण्यासारखे काहिही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये.
  • येथे चोरी करणारा नेहमी पकडला जातो. याची कृपया नोंद घ्यावी.
  • भिकारी लोकांस सुचना: कुत्रे व भुतांपासून सावध रहा.
  • सेल्समननी आत येऊ नये. सेल्सगर्ल आत आल्यास मालक जबाबदार नाही.
  • पत्ता सांगायचे ५ रूपये पडतील. हे असे का लिहीले आहे हे सांगायचे १० रूपये पडतील.
  • पोष्टमनास सुचना: कृपया पत्रें या खिडकीतून आत टाकू नयेत. आमटीत पडतात, चव बिघडते.
  • आजचे ताजे पदार्थ: भजी व मिसळ. मुळव्याधीचे औषध मिळेल.
  • आम्ही ऊपवासाचे पदार्थ वेगळ्या तव्यावर करतो.
  • लाईट गेल्यास कॆण्डल-लाईट डिनरचा वेगळा चार्ज पडेल.
  • वेटरला टिप देऊ नये. आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो.
  • बाहेरील पदार्थ आत आणू नयेत. आतील पदार्थ बाहेर नेऊन खाल्ले तर चालेल.
  • कृपया चूळ भरताना घाणेरडे आवाज काढू नयेत. 
  • आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.
  • ए नाही अहो रिक्षावाले म्हणा.
  • रिक्षात तंबाखु, गुटखा खाऊन बसू नये व बसून खाऊ नये.
  • अनोळखी वस्तू किंवा व्यक्तींस स्पर्श करू नये.
  • गाडीवरील धुळीत लिहिलेले वाक्य: आता तरी पुसा!
  • गॆरेज: इथे अपली वाहणे कालजीपूवक दुरुस्ती करूण मिलेल
  • इथे अर्जंट शेवया करून व ब्लाऊज शिवून मिळेल.
  • येथे लघवी करू नये. वरून लोकं पहातात.
  • "दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र": डेअरी!
  • "दंतोपचार, दंत दुरूस्ती व दंतौषधी विक्री केन्द्र" : डेन्टल क्लिनीक!

Monday, May 10, 2010

समज - गैरसमज

रोजच्या जगण्यात (साहित्तिक भाषेत लिवायचं म्हंजी ’दैनंदिन जीवनात’) आपण अनेक रुढी-प्रथांना कवटाळून रहातो. त्यापैकी काही प्रथांची तार्किक कारणं सांगू शकतो, तर काही प्रथा अनाकलनीय वाटतात.
या लेखात मी अशाच काही समज-गैरसमजांचा संग्रह करणार आहे.

समज -गैरसमज...


  • साय़ंकाळी दिवा लावल्यावर हात-पाय धुवू नयेत, तसेच केर-कचरा काढू नये.
    पुर्वी दिवेलागणीच्या वेळेला परवचा-पाढे म्हणत. या प्रथेमुळे मुले-बाळे मोठी माणसं आपोआप घरी लवकर परतत. सर्वजण मिळून स्तोत्रे म्हणत, एकत्र जेवण करत. तसेच आधी tubelights वगैरे नसल्यामुळे केर वगैरे काढला तर घरातील काही महत्त्वाची वस्तू बाहेर जाण्याची शक्यता असायची.
    आजच्या काळात हे सर्व शक्य नसले तरी या प्रथेचे स्पष्टीकरण देता येते.

  • मांजर आडवं गेलं तर काम होत नाही. मांजरांनी काय गुनाव केला वो? कुत्र्या-मांजरांसारख्या निष्पाप प्राण्यांपेक्षा (काही) माणसं आडवी गेली तर तो अपशकून ठरतो.  

  • शुक्रवारी पैसे देऊ नयेत, द्यायचेच असतील तर मंगळवारी द्यावेत. शुक्रवार देवीचा (लक्ष्मीचा) वार, म्हणून पैसे देऊ नयेत हे पटण्याजोगे आहे; पण मंगळवारी पैसे का द्यावेत हे माहीत नाय बा...

  • एखाद्याला बाहेर जाताना ’कुठे जातोस" असे विचारू नये, त्याने काम होत नाही. साक्षात समर्थ उत्तम लक्षण सांगताना लिहून गेलेत की "जाणारास पुसो नये कोठे जातोस म्हणोनी". एकदम बरोबर... अनेकदा आपल्याला सांगायचं नसतं. मग चिडचिड होते, काही तरी थातूरमातूर कारणं द्यावी/ऐकावी लागतात. त्यापेक्षा न विचारलेलं बरं! 

  • एखाद्याला घरी यायला ऊशीर होत असेल तर, दाराला पळी (संध्येत वापरतात ती, आमटीत बुडवतात ती नव्हे ) अडकवावी, म्हणजे माणूस लवकर घरी परत येतं. असं एक-दोनदा झालंय... म्हणजे होतं कसं की फ़ारच वाट पहायला लागली की शेवटी वैतागून आपण पळी अडकवायला आणि दाराची बेल वाजयला एकच गाठ पडते. पण हा निव्वळ योगायोग असावा.

  • केळं अर्धवट खाऊन टाकू नये; तसंच दहीभात पानात टाकू नये. कारण केळ्याला ब्रह्मफ़ळ मानतात व दहीभाताला पुर्णान्न... काही ठावकी नाय बुवा, पण केळं काय किंवा दहीभात काय, पानात काहीच टाकू नये हे बरं!

  • गणेश चतुर्थीला चंद्र पाहील्यास चोरीचा आळ येतो... जसा श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता (बाकी, कृष्णदेवांवर कोणता आळ यायचा बाकी होता!).
    पण लहानपणी रात्री घरोघरच्या धुपारत्या आटपून पायवाटेने येत असता चंद्राचाच प्रकाश कामी यायचा आणि हटकून नजर जायची! तेव्हा, ही फ़क्त एक पुराणकथाच असावी.

  • खिडकीबाहेर कावळा ओरडला की घरी पाहुणे येतात... धादांत असत्य! कावळा ओरडो अथवा न ओरडो, पाहुणे लोक यायचे तेव्हाच येतात (आणि त्यांना जायचे तेव्हाच जातात).

  • मुंगूसाचे दर्शन शुभ असते... मी रहातो तिथे अनेकदा मुंगूस दिसते. त्या दिवशी विशेष असं काही घडल्याचं स्मरत नाही (हां, कधी कधी टिफ़ीनमध्ये बटाटयाची भाजी निघते हे खरंय!), तरी मुंगूसाची ती झुपकेदार शेपटी बघण्यातही आनंद असतो.




... आणि काही यक्ष-प्रश्न!
दैनंदिन जीवनात (च्यामारी!) काही प्रश्न असे असतात, जरा ऊवांसारखे...  म्हटलं तर क्षुल्लक, म्हटलं तर डोकं खाजवायला लावणारे.  त्यांचा (प्रश्नांचा.. ऊवांचा नव्हे!)  समावेश मी या भागात करणार आहे. (अर्थात या शंका-कुशंकाना यक्ष-प्रश्न वगैरे म्हणणे म्हणजे, बाभुळगावच्या बबन्याने स्वत:ला बिल गेट्स समजण्यासारखेच आहे... पण ते एक असो!)


  • माणसं मंदिरात प्रदक्षिणा काढताना, देवाच्या मागं जाऊन डोकं का बरं टेकवतात? असं डोकं टेकवत राहिल्याने तिथे खोलगट भाग तयार होतो, डोस्क्यांचं तेल लागून जागा ओलसर होते, आणि मग माणसं तिथे नाणी चिकटवतात!

  •  माणसं जांभई देताना चुटक्या का वाजवतात? माश्या वगैरे तोंडात जाऊ नये म्हणावं तर इतर वेळी हीच लोकं तोंड मोकळं सोडून बोलत असतात.

[ समज-गैरसमज आणि प्रश्न... संपलेले नाहीत! जसजसे आठवत जातील तसतसे लिहीत जाईन..]

Tuesday, May 4, 2010

मुलं आणि मारामारी

काही दिवसांपुर्वीची गोष्ट... रस्त्याने चाललो होतो. बाजूनं काही शाळकरी मुलं जात होती. त्यातील दोघांची नुकतीच मारामारी झाली असावी, कारण कपडे मातीने माखलेले होते, हाता-पायांवर खरचटल्याच्या खुणा ठळक दिसत होत्या. महत्त्वाचे म्हणजे रस्त्याने जाताना पण त्यांची जोरजोरात बाचाबाची चालू होती. विषय अर्थातच IPL मधील Mumbai Indians चा पराभव व सचिन तेंडुलकरची कर्णधार म्हणून क्षमता. आता, सचिन तेंडुलकरचा विषय निघाला कि थोर-थोर लोक सुद्धा हमरी तुमरीवर येतात, तिथे पोरांमध्ये मारामारी व्हावी यात नवल नव्हते.

शाळेत असताना मारामारी हा रोजच्या विषयांपैकी एक असावा असे वाटण्य़ाइतपत परिस्थिती होती. माझे काही परम-मित्र तर शिकण्यापेक्षा भांडायलाच शाळेत येत असावेत. भांडायला कारण काही लागायचे नाही. तुला माझ्यापेक्षा जास्त मार्क का मिळाले, इथपासून ते, तू माझ्याकडे रोखून का पाहिलेस, या पैकी कशावरूनही युद्ध पेटायचे.




सुरवात साधारणपणे आम्ही प्रार्थना (Assembly) संपवून वर्गात परतत असताना धक्कबुक्की करणे, In केलेला शर्ट बाहेर ओढून काढणे इथून करत. मग दिवसभर वर्गात कागदी बोळे फ़ेकून मारणे, पेन्सिलीचे टोक मोडणे, Camlin च्या पट्ट्या (Ruler) मोडणे असा गनिमी कावा चालून शेवटी सांगता  शाळेच्या क्रीडांगणावर वर्ग-बंधूंच्या ( आणि काही भगिनींच्या) साक्षीने तुफ़ान हाणामारीने व्हायची. एकमेकांना (आणि काही बघ्यांना) व्यवस्थित चोप दिल्यावर भिडू "आजचा दिवस सत्कारणी लागला" या समाधानात आप-आपल्या घरी जात.




काही येरूंच्या तोंडी मात्र "हात लावलास तर याद राख" "उद्या बघून घेईन" अशी - केवळ भारताच्या संरक्षण-मंत्र्यांच्या तोंडीच शोभणारी - भाषा असायची; तर काही शूरवीर "बाबांना नाव सांगीन" "टिचरला कंप्लेन करीन" वगैरे धमक्या द्यायचे. यदाकदाचित हे लोक पुढे भारताचे पंतप्रधान वगैरे झालेच तर "अमेरिकेला नाव सांगीन हं" वगैरे बाता करायला त्यांना हा अनुभव कामी येईल. असो!

आजकाल भांडण करणे, हा प्रकार मुलांमध्ये थोडा कमीच होत चालला आहे असे वाटते. कारण आई-बाप (म्हणजे पालक लोक) "जागरूक" झाले आहेत. पोराला कोणी बोट जरी लावले असेल तरी पहिला फोन त्या "गुंड" मुलाच्या घरी जातो, आणि दुसरा शाळेच्या प्रिन्सिपलना. इकडे मुलं आपलं भांडण विसरून मजेत खेळत असतात अन तिकडे दोन्ही पालक एकमेकांची ऊणीदुणी काढत रहातात.


मला स्वत:ला मारामारी न करणारे बालक, आणि मारामारी करणारे पालक.. दोन्ही पण मुळीच आवडत नाहीत!